Havaman Andaj । मागच्या एक महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाचे आता जोरदार कमबॅक झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात सर्वत्र पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे बळीराजा देखील सुखावला आहे. कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात सर्वत्र जलधारा कोसळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
राज्यात या सहा जिल्ह्यांना अलर्ट जारी
हवामान विभागाने राज्यातील सहा जिल्ह्यांना शनिवारी म्हणजेच आज ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामध्ये सातारा, रत्नागिरी, पुणे, ठाणे, नाशिक आणि पालघरचा समावेश आहे. या जिल्ह्यामध्ये हवामान विभागाने मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. त्याचबरोबर राज्यातील उर्वरित भागांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नांदेड, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यांमध्ये पावसाचा कोणताही अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. त्यामुळे त्या ठिकाणचे शेतकरी सध्या चिंतेत आहेत. पाऊस पडेल का नाही असा प्रश्न येथील शेतकऱ्यांना पडला आहे
अजून किती दिवस असणार पावसाचा जोर
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यांमध्ये 17 सप्टेंबर पर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे. त्याचबरोबर पुढील दोन दिवस अजून राज्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे. या पावसाचा फायदा सध्याच्या खरीप हंगामाला होणार नसला तरी रब्बी हंगामाला मात्र याचा चांगला फायदा होणार आहे
कोकणामध्ये मुसळधार पाऊस
कोकणातील अनेक जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. रत्नागिरीमध्ये शुक्रवारी पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू असून या पावसाचा जोर आणखीनच वाढला आहे. त्याचबरोबर नंदुरबार, परभणी जिल्ह्यामध्ये पावसाचे जोरदार कमबॅक झाले आहे. गेल्या 24 तासात 18 मिलिमीटर पाऊस झाल्यामुळे पिकांना जीवनदान मिळाल आहे.