Onion Rate । मागच्या काही दिवसापासून कांद्याला म्हणावा असा दर मिळत नाही त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळत आहे. कांद्याचे दर वाढावेत यासाठी ठिकठिकाणी आंदोलने देखील करण्यात आली आहेत. दरम्यान नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा व्यापाऱ्यांच्या मागण्या व समस्यांवर जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली होती. मात्र या बैठकीमध्ये कुठलाही तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे आजपासून नाशिक जिल्ह्यातील सर्व 15 बाजार समिती व उपबाजार समितीत व्यापाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे.
नेमक्या मागण्या कोणत्या?
नाफेड व एनसीसीएफ मार्फत खरेदी केलेला कांदा थेट बाजारात विक्री करू नये. कांद्यावर लादलेले 40% निर्यात शुल्क रद्द करावे. एक टक्का बाजार फी, अर्धा टक्का करावी. देशातील विक्रेत्यांकडून चार टक्के आडत घ्यावी. अशा शेतकऱ्यांच्या मागणी आहेत या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत कांदा लिलावात सहभागी न होण्याचा कांदा व्यापाऱ्यांनी निर्णय घेतला आहे.
व्यापाऱ्यांनी बंद पुकारल्यामुळे शेतकऱ्यांकडे जो कांदा शिल्लक आहे तो कांदा मात्र चाळीतच पडून राहणार आहे. दरम्यान या मागण्यांबाबत दोन दिवसात पुन्हा व्यापाऱ्यांची बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे. आता या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय होणार? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.