Crop Insurance । अहमदनगर : पावसाला पोषक परिस्थिती निर्माण झाली नसल्याने राज्यातील पाऊस लांबणीवर पडला आहे. पावसाअभावी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे. पाणी नसल्याने पिके जळून गेली आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पंतप्रधान पिक विमा योजनेत सहभाग घेतला आहे. याच शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
कर्जत-जामखेड मतदारसंघातील शेतकऱ्यांनी कापूस, मका, तूर, बाजरी, उडीद, सोयाबीन, मूग या पिकांसाठी विमा संरक्षण घेतले होते. या योजनेअंतर्गत या हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत अधिसूचित महसूल मंडळांमध्ये सात वर्षांच्या सरासरी उत्पन्नाच्या तुलनेत ५० टक्के गट अपेक्षित असावी आणि त्या अनुषंगाने राज्यशासन,विमा कंपनी आणि शेतकरी प्रतिनिधी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संयुक्त सर्वेक्षण करतात.
त्यांच्या अहवालानुसार नुकसान भरपाई रकमेच्या २५ टक्के आगाऊ रक्कम देण्याची तरतूद त्यात केली आहे. संपूर्ण जिल्ह्याला याचा फायदा होणार आहे. दरम्यान, आगाऊ रक्कम देण्याची तरतूद लवकर मंजूर होत नव्हती. त्यासाठी आमदार रोहित पवार यांनी पुढाकार घेतला. त्यांनी यासंदर्भात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली.
हा प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी विनंती रोहित पवार यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली होती. अखेर त्यांच्या मागणीला यश आले आहे. त्यानुसार कर्जत-जामखेड मतदारसंघातील शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाईच्या २५ टक्के मर्यादेपर्यंत आगाऊ रक्कम दिली जाणार आहे.