Onion Rate । राज्यात आता पुन्हा एकदा कांदा प्रश्नावरून वाद निर्माण झाला आहे. मागच्या सात दिवसापासून नाशिक जिल्ह्यात कांदा लिलाव पूर्णपणे बंद आहेत. कांदा व्यापाऱ्यांनी काही मागण्यांसह मागच्या सात दिवसापासून लिलाव बंद ठेवले आहेत. या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे तर विरोधकांनी याच मुद्द्यावरून सरकारवर टीका देखील केली आहे.
Property Law । महिलांना संपत्तीत असतात ‘हे’ महत्त्वाचे अधिकार, माहिती नसतील जाणून घ्या
यामध्येच आता सुप्रिया सुळे यांनी देखील कांद्याच्या प्रश्नावरून सरकारवर निशाणा साधला आहे. शासन सातत्याने शेतकरी विरोधी भूमिका घेत आहे असा गंभीर आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी एक ट्विट केले आहे.
सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत म्हटले की, “नाफेड आणि एनसीसीएफ या शासकीय संस्थांनी खुल्या बाजारात कांदा विक्री करण्यास सुरुवात केली आहे. याखेरीज शासनाने कांद्यावर ४० टक्के निर्यातशुल्क लावून कांदा उत्पादक आणि व्यापारी या दोघांचेही नुकसान करण्याची भूमिका घेतली आहे. याच्या विरोधात कांदा व्यापारी संपावर गेले आहेत. याबाबत शासनाने व्यापाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठका निष्फळ ठरत आहे”.
“शासन सातत्याने शेतकरी विरोधी भूमिका घेत आहे. यावर्षी कमी पावसामुळे हातची पिकं गेली आहेत. दुसरीकडे महागाईचा आगडोंब उसळला असताना शेतकऱ्यांना चार पैसे मिळत असतील तर त्याला शासन विरोध करीत आहे, हे खेदजनक आहे. सत्ताधाऱ्यांना शेतकरीविरोधी निर्णय घेण्यासाठी कोण भाग पाडत आहे, हे जनतेसमोर आले पाहिजे. शासनाने आपली अडवणूकीची भूमिका सोडून शेतकरी,ग्राहक आणि व्यापारी अशी तिघांच्याही हिताची भूमिका घ्यावी हि विनंती”. असे ट्विट सुप्रिया सुळे यांनी केले आहे.